गुरुवार, 30 नवंबर 2017

👉 एक रूपयाच्या नोटेला 100 वर्ष पूर्ण!

👉 एक रूपयाच्या नोटेला 100 वर्ष पूर्ण!


आजकाल एक रूपयाची नोट सापडणं जरा कठिणच होऊन बसलंय. असं असलं तरी काही जण पुढच्या पिढीला सांगता यावी, दाखवता यावी म्हणून ही नोट सांभाळून ठेवतात. आज (30 नोव्हेंबर रोजी) याच एक रूपयाच्या नोटेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. 30 नोव्हेंबर 1917 रोजी पहिल्यांदा देशात एक रूपयाची नोट जारी करण्यात आली होती. यानिमित्ताने जाणून घेऊया एक रूपयाच्या नोटेचा रंजक प्रवास...



1) पहिलं विश्वयुद्ध आणि देशाची सत्ता इंग्रजांच्या हातात होती. त्याकाळात 1 रुपयांचा चांदीचा शिक्का चलनात होता. मात्र, युद्धकाळात 1 रुपयांचा शिक्का बनवण्यात अडथळा निर्माण झाला आणि त्यानंतर 1917 मध्ये पहिल्यांदा 1 रुपयांची नोट समोर आली. 

2) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, नोट छापण्याचा खर्च परवडत नसल्याने एक रुपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा 1926 मध्ये बंद करण्यात आली होती. त्यानंतर 1940 मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली, जी 1994 सालापर्यंत चालू राहिली. त्यानंतर 2015 साली पुन्हा छपाई सुरु करण्यात आली.

3) एक रुपयांची नोट ही इतर भारतीय नोटांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून जारी केली जात नाही, तर भारत सरकारकडून जारी केली जाते. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसते, तर केंद्रीय अर्थसचिवांची स्वाक्षरी असते.

4) कायद्याच्या आधारे एक रुपयाची नोट ही खऱ्या अर्थाने ‘मुद्रा’ नोट (करन्सी नोट) आहे. इतर नोटा या प्रॉमिसरी नोट असतात. प्रॉमिसरी नोटांवरुन केवळ नमूद रक्कम देण्याचे वचन दिले जाते.

5) इंग्रजांच्या काळात एक रुपयाच्या नोटेवर ब्रिटिश सरकारच्या तीन अर्थ सचिवांच्या स्वाक्षऱ्या असायच्या. एमएमएस गुब्बे, एसी मॅकवॉटर्स आणि एच. डेनिंग यांच्या स्वाक्षऱ्या नोटेवर असायच्या. मात्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत 18 अर्थसचिवांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत.

6) एक रुपयाच्या नोटेची छपाई इतिहासात आतापर्यंत दोनदा रोखण्यात आली होती. शिवाय, नोटेच्या डिझाईनमध्येही तीन-एकवेळा लहान-मोठे बदल करण्यात आले होते, असे दादरमधील नाण्यांचा संग्रह करणाऱ्या गिरीश वीरा यांनी माहिती देताना सांगितले.

7) रुपया शब्दाचे मुळ संस्कृतमधील रुप् किंवा रुप्याह् येथून आहे. याचा अर्थ कच्ची चांदी असा होतो आणि रुप्यकम्चा अर्थ चांदीचा शिक्का असा होतो. रुपया शब्दाचा प्रयोग सर्वातआधी शेरशाह सुरी यांनी आपल्या शासन (1540-1545) दरम्यान केला होता.

8) शेरशाह सुरी यांनी आपल्या शासन काळात चांदीच्या शिक्यांचा वापर सुरु केला. त्याचे वजन 178 ग्रेन (11.534 ग्रॅम) होते. पूर्वी रुपया (11.66 ग्रॅम)ला 16 आणे म्हणजेच 64 पैसे किंवा 192 पाईत विभागले जात होते. त्यानंतर 1957 मध्ये एक रुपया 100 पैशांत विभाजित झाला.


👉 आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम…

👉 आता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम…



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले. परंतु वेळापत्रकासह बोर्डाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवे नियम देखील जारी केले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...


1) परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांचे दहा मिनिट आधी वाटप करण्यात येते, विद्यार्थ्यांना तोपर्यंत वर्गात प्रवेश दिला जातो. पण आता परीक्षेची वेळ सुरु झाली की, विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश मिळणार नाही. जर विद्यार्थ्याला परीक्षेला यायला एक मिनिटही उशीर झाला तर विद्यार्थ्यांला खोलीत प्रवेश मिळणार नाही.

अपवादात्मक परिस्थितीत आणि सशक्त कारणासह विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. मात्र उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांची कारणांसह नोंद करुन ठेवा, असे निर्देश बोर्डाने पर्यवेक्षकांना दिले आहेत.

असं का? :
गेल्यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटण्याचे सत्र गाजल्यानंतर हे प्रकार रोखण्यासाठी, योग्य ती पावले उचलण्यास बोर्डाने सुरुवात केली आहे. त्यानुसार परीक्षेसाठी उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.




2) परीक्षेची वेळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीतच बसून रहावे लागणार आहे.

असं का? :
झटपट परीक्षा देऊन पळ काढणाऱ्या आणि परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने हा निर्णय घेतला आहे.




3) विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान केवळ वॉशरुम वापरण्याची परवानगी आहे. विद्यार्थ्यांना टॉयलेट ब्रेक घेता येईल, मात्र त्यासाठी उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पर्यवेक्षकांकडे ठेवावी लागेल.

असं का?: 
कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान शिक्षकांनी या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. काही विद्यार्थी अतिरिक्त वेळ गैरप्रकार करतात, या नियमांमुळे त्याला आळा बसेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.